ज्ञानातून समृद्धीकडे

अभंग आस्वाद - ३

करितां चिंतन विठोबाचें

न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥1॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥2॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥3॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर ह्मणतां वाचे ॥4॥
तुका ह्मणे आस जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥5॥

विषयांचे चिंतन करून काय मिळते? द्रव्य, दारेचे चिंतन करून काय त्या गोष्टी मिळतात का? पण विठोबाचे चिंतन केल्यास मात्र तो प्रत्यक्ष भेटायला येतो असा विश्वास तुकाराम देतात. द्रौपदीला नाही का चिंतनमात्रे कृष्णाने वस्त्रे पुरवली? १००% निष्ठेने आपली आस विषयांकडून ईश्वराकडे वळवली तर भवसागर तरून जाल असे ते म्हणतात.

अभंग आस्वाद - २

फुटती तरुवर उष्णकाळमासीं
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥1॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥2॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥3॥
तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥4॥

या दीड वीत पोटाच्या काळजीने इतके हातघाईवर का येता बरे? जन्माला घातले तेव्हा देवाने दुधाची सोय केली होती की नाही? पशू, पक्ष्यांची काळजी देव करतोच की! मग माणूसच का इतका घाबरून राहतो बरं? उन्हाळ्यात कोणीही पाणी घालत नसताना झाडांना पालवी फुटते हा ईश्वराचा चमत्कारच आहे. विश्वंभराचे ध्यान करा, नाम घ्या आणि चिंतामुक्त व्हा हाच तुकारामांचा संदेश आहे.

अभंग आस्वाद - १

सदैव तुह्मां अवघें आहे
सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥
मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥
घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥

आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे ते पाहावे. आणि त्याचा सत्कर्मासाठी उपयोग करावा.
इतर काही नसेल पण हात पाय तर आहेत ना? कान आहेत, डोळे आहेत. त्याचा उपयोग आपण कसा करतो? स्वार्थाकरता करण्यात काहीच वाईट नाही पण आपण तर त्याचा उपयोग इतरांना त्रास देण्यासाठी करतो. त्याऐवजी शरीराचा उपयोग ईश्वराकडे जाण्यासाठी का करू नये? सदैव याचा अर्थ'नेहमी' असा नसून तुम्ही सुदैवी आहात असा घ्यायचा आहे.
आपल्या हिताकरता आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे थोडेच होणार आहे?

Syndicate content